Showing posts with label नथुराम गोडसे. Show all posts
Showing posts with label नथुराम गोडसे. Show all posts

Wednesday, 4 April 2018

५५ कोटींचा बहाणा

नथुराम गोडसे याचा भाऊ गोपाळ गोडसे याने गांधी हत्येवर  ‘५५ कोटींचे बळी’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात गोपाळ गोडसे म्हणतो की, ‘भारताच्या फाळणीच्या वेळी भारत सरकारच्या कोषात जी शिल्लक होती, त्यातील ५५ कोटी रुपये पाकिस्तानच्या वाट्याला गेले होते. पाकिस्तानने काश्मिरात सैन्य घुसविल्यामुळे भारत सरकारने हे ५५ कोटी रुपये देण्याचे नाकारले. मात्र महात्मा गांधी यांनी अशा प्रकारे वचन मोडणे चुकीचे असल्याचे सांगून पाकिस्तानला ठरल्या प्रमाणे ५५ कोटी रुपये देण्यास सांगितले. इतकेच नव्हे, तर आठवड्यात उपोषणही केले. त्यामुळे १३ जानेवारी १९४८ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने एक पाकिस्तानला हा पैसा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे प्रक्षुब्ध झालेल्या गोडसे आणि त्याच्या मित्रांनी महात्मा गांधी यांची हत्या केली...‘
गोपाळ गोडसे याने केलेला हा दावा खोटा आहे. फाळणीच्या वेळी पाकिस्तानला एकूण ७५ कोटी रुपये देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यातील २० कोटी रुपयांचा पहिला हप्ता पाकिस्तानला देण्यातही आला होता. उरलेले ५५ कोटी रुपये देण्याचे भारत सरकारने रद्द केले नव्हते. या पैशाचे हस्तांतरण केवळ तात्पुरत्या स्वरूपात रोखण्यात आले होते.  पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा निर्णय भारत सरकारने १३ जानेवारी १९४८ रोजी घेतला होता. त्या आधी महात्मा गांधी यांना मारण्याचे एकूण ५ प्रयत्न झाले होते. १९३४ मध्येच गांधींना मारण्याचा पहिला प्रयत्न झाला. याचाच अर्थ ५५ कोटींच्या घटनेच्या तब्बल १४ वर्षे आधीपासून गांधींना मारण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. त्यामुळे ५५ कोटींचे बळी हा गोपाळ गोडसे याचा दावाच खोटा ठरतो.
महात्मा गांधी यांच्या हत्येमागील कारणे वेगळीच आहेत.
सर्व प्रथम एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, गांधी हत्येतील सर्व आरोपी ब्राह्मण आहेत. महात्मा गांधी हे भारताचे निर्विवाद नेते असले तरी ते जातीने ब्राह्मण नव्हते. ते बहुजन समाजातून आले होते. ब्राह्मणेतराने देशाचे नेतृत्व करावे हे ब्राह्मणवाद्यांच्या पचनी पडत नव्हते. अनेक बडे ब्राह्मण नेतेही त्याकाळी महात्मा गांधी यांची अनुयायी होते. पंडीत जवाहरलाल नेहरू हे काश्मिरी ब्राह्मण होते. महाराष्ट्रातील साने गुरुजी आणि विनोबा भावे ही त्यातील काही ठळक नावे होत. महात्मा गांधी यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना आपले अध्यात्मिक गुरू मानले होते. महाराष्ट्रातील ब्राह्मणवादी तुकाराम महाराजांना शत्रूस्थानी मानीत असत.
ही गांधी हत्येमागील खरी कारणे आहेत. महात्या गांधी जातीने ब्राह्मण असते आणि त्यांनी तुकोबांऐवजी रामदासांना गुरू मानले असते, तर ब्राह्मणांनी त्यांची नक्कीच नित्यपुजा केली असती.