Showing posts with label मनुस्मृती. Show all posts
Showing posts with label मनुस्मृती. Show all posts

Tuesday, 29 May 2018

भिडे एकटे कुठे आहेत?

मनोहर भिडे म्हणाले मनूच्या सावलीला उभं राहण्याची लायकी नाही. मनुस्मृती ही पहिली घटना असल्याचे तारे तोडलेत. मनुस्मृती पहिली घटना आहे आणि तिच्याबद्दल भिडेंना सहानुभूती आहे यात नवल काय? मनुस्मृती ब्राह्मणांना उच्च मानते तर ब्राह्मणेतरांना समानतेचा अधिकार नाकारते. मनुस्मृती पहिली घटना होती आणि तिची अंमलबजावणी मोठ्या काटेकोरपणाने करण्यात आली होती. माणसांना माणसांप्रमाणे न वागवणारी मनुस्मृती किती योग्य वाटतेय भिडेंना.

पण भिडे एकटे कुठे आहेत? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर यांनी सुद्धा मनुस्मृतीचे समर्थन त्यांच्या विचारधन पुस्तकात केलेले आहेच की. आणि त्यांच्या अनुयायांनी ते पुस्तक शिरसावंद्य मानून त्याच मनुस्मृतीचे गुप्तपणे केलेले पालन आपण वेळोवेळी पाहतच आलोय.

मनुस्मृतीचे नियम मोडणाऱ्या तुकारामांना गाथा बुडवायला लावली ती वृत्ती कोणती होती? मनुस्मृती ब्राह्मणांना विशेष अधिकार देते कारण ब्राम्हण ब्रम्हाच्या मुखातून उत्पन्न झाले आहेत. याच घटनेने शिक्षणाचा अधिकार ब्राह्मणांकडे ठेवला होता. संस्कृत देव भाषा ती ऐकली तर, वाचली तर भयंकर शिक्षा देण्यात येत असत. महात्मा फुलेंनी ती चौकट मोडली. त्यासाठी त्यांच्यावरही मारेकरी घातले गेले. सावित्रीमाईंना शेणाच्या गोळ्यांचा, दगडांचा मारा सहन करावा लागला. पराकोटीचा त्रास दिला गेला. तरीही महात्मा फुले आणि सावित्रीमाईंनी आपले काम थांबवले नाही. बहुजन, शूद्र व अतिशूद्र यांच्यासाठी शिक्षणाची द्वारे उघडलीत. पण भिडे महात्मा फुलेंबद्दल अपशब्द उच्चारतो. का कारण महात्मा फुले मनुस्मृतीची चौकट मोडून काढतात. भिडेंच्या संघटनेत महिलांना प्रवेश नाही याची कारणे त्यांच्या भक्तांनाच ठाऊक. पण बहुजनांच्या शिक्षणाची महात्मा फुलेंनी उघडलेली द्वारे भिडे मोठ्या शिताफीने अडवताहेत. त्यासाठी शिवरायांचा आडोसा घेताहेत. आणि आता मनुस्मृतीचे समर्थन करून बहुजनांची डोकी ठिकाणावर नसल्याचे त्यांनी दाखवून दिलंय.

छत्रपती शाहूंचे वेदोक्त प्रकरण व त्यांना शूद्र म्हणण्याचा अधिकार मनुस्मृतीने दिला. मात्र त्यामुळे पेटून उठत शाहू महाराजांनी त्या चौकटीच्या चिंधड्या उडवल्या. शाहू महाराजांनी केलेलं काम मनुस्मृतीच्या मुळावर घाव घालणारे ठरले. शाहूंचा विचार जनमानसात रुजला पण त्याची किंमत हिंदुत्ववाद्यांच्या आहारी गेलेल्या कित्येकांना कळली नाही.

पूर्वी कधीकाळी टिळकांनी म्हंटले होते की तेल्यांना संसदेत जाऊन काय तेल काढायचे आहे का? की कुणब्यांना नांगर धरायचा आहे? यातून टिळकांना काय अपेक्षित असावं याची झलक दिसते. टिळक गेल्यावर गांधींनी सर्वसमावेशक राजकारण करण्यास सुरुवात केली आणि कित्येक सनातनी लोकांच्या डोळ्यात गांधी खुपायला लागले. गांधींचा खून याच वृत्तीने केला. कारण त्यांना त्यांच्या हातातून गेलेली सत्तेची सूत्रे जास्त खुपत होती. गांधींना ठार करण्याची वेळ त्यांनी मोठ्या चलाखीने निवडली. आणि त्याचा प्रचारही मोठ्या चलाखीने केला गेला. पण फाळणीआधी गांधींना मारण्याचे 6 हुन अधिक प्रयत्न केले गेले होते हे समोर येऊच दिले गेले नाही.

बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि समानतेने जगण्याचा हक्क प्रत्येकाला आहे हा संदेश सर्वांना दिला. मनुस्मृतीचे पालन करणाऱ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना कमी त्रास दिला नाही.

मनुस्मृतीचा उदोउदो करणं गरजेचं का आहे? कारण प्राचिन ग्रंथाच्या नावावर जातिश्रेष्ठत्वा लोकांच्या मनावर बिंबवता येतं. ज्या मनुस्मृतीने बहुजनांना समानतेचा अधिकार नाकारला ते बहुजन तरुण धर्माभिमानाच्या खोट्या अहंकारात स्वतःच्या गुलामीच्या कारणांना डोक्यावर घेऊन मिरवताय. त्यांना स्वतःच्या होणाऱ्या पतनाची केंद्रे आणि कारणे समजून घ्यायची नाहीयेत. डोळ्यावर असलेली धर्माभिमानाची पट्टी त्यांना डोळस होऊ देत नाहीये. जागतिकीकरणाने उघडलेली संधीची द्वारे न पाहता ते मनुस्मृतीच्या समर्थकांचा उदोउदो करण्यात गुंग आहेत. या उदोउदोतून डोकं वर काढून विचार करण्याची सुद्धा बुद्धी या तरुणांकडे नाही.

- राहुल बोरसे.