लेखक/संपादक/संकलक : विराज शांताराम

Monday 29 February 2016

शिवरायांच्या वाटेला जाऊ नका!!

दैनिक सामना मध्ये प्रसिद्ध झालेला अग्रलेख

 शिवरायांच्या वाटेला जाऊ नका!!
Monday, February 29th, 2016
छत्रपती शिवाजीसारखा न्यायप्रिय राजा जगाच्या इतिहासात झाला नाही. स्त्रीचारित्र्यावर घाला घालणार्‍यांना कडेलोटाची सजा फर्मावणारा हा राजा महाराष्ट्रात जन्मास आला व इतिहास घडला. त्या राजाचे शिवस्मारक रोखण्याची भाषा कराल तर याद राखा! होय, माय लॉर्ड! तुमच्याविषयी पूर्ण आदर ठेवूनच आम्ही हे निर्भीडपणे सांगत आहोत. तुमचा कायदा तुमच्यापाशी. महाराष्ट्र फक्त शिवरायांना पुजतो व त्यांचाच कायदा मानतो!

माय लॉर्ड, जरा जपून!शिवरायांच्या वाटेला जाऊ नका!!

‘‘भ्रष्टाचार, अप्रामाणिकपणा, फसवणूक इत्यादी गैरप्रकारांना न्यायालयांमध्ये जेवढा वाव मिळतो तेवढा इतरत्र कोठेच मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. या गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून सरकार कायदे करून आपल्या परीने प्रयत्न करीत असते. न्यायालयाचे कामकाज चालू असताना सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत आहे की नाही, इकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे.’’
– लॉर्ड हेलरॉम
(इंग्लंडचे माजी न्यायमंत्री)

हिंदुस्थानची ‘न्यायव्यवस्था’, संसदीय पद्धत आपण ब्रिटिशांकडून घेतली आहे. त्यामुळे तेथील न्यायव्यवस्थेचे सर्व गुणदोष आपल्या न्यायव्यवस्थेत उतरले आहेत. आपली न्यायालये सध्या न्यायदानापेक्षा ‘कायदाबाह्य’ विषयांत जरा जास्तच रस घेऊ लागली आहेत. वाघाच्या तोंडास रक्त लागले तर एकवेळ चालेल, कारण वाघ असला तरी तो ऊठसूट कुणावरही झडप मारून रक्त पीत नाही. पोट भरले असेल तर तो शिकार करीत नाही, पण लांडग्याच्या तोंडास रक्त लागले तर ते वाईट. त्याला लांडगेतोडीची चटक लागते व तो कुणाचेही लचके तोडीत धुमाकूळ घालतो. आमच्या न्यायालयांच्या तोंडास राजकारण्यांचे रक्त लागले आहे. हे तोंड वाघाचे की लांडग्याचे हे ज्याचे त्याने ठरवावे. जो समोर येईल त्याचे लचके न्यायमंदिरात तोडले जात असतील तर तेथे डॉ. आंबेडकरांचा कायदा नसून जंगलचा कायदा आहे काय? असा प्रश्‍न पडतो. राज्यकर्ते, राजकारणी व समोर येईल त्याला रोज न्यायालये फटकारीत आहेत. हे सर्व तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा तसे चालले आहे, पण मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन ‘रामशास्त्र्यां’नी छत्रपती शिवाजी महाराजांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला. रामशास्त्र्यांनी लोकनियुक्त सरकारच्या मानेवर सुरा ठेवून खंडणी मागावी अशा आवेशाने सांगितले की, ‘माझगाव कोर्टाची इमारत दुरुस्त करा, नाहीतर समुद्रात होणारे स्मारक रोखू!’ ही धमकीच म्हणावी लागेल. अशी धमकी एखाद्या गुंडाने किंवा राजकीय कार्यकर्त्याने दिली असती तर त्याच्यावर खंडणी, जबरन वसुली, किडनॅपिंग, चोरी अशी विविध कलमे लावून गुन्हा दाखल केला असता. पण तोच ‘गुन्हा’ न्यायमंदिरात झाला असेल तर शिक्षा कुणाला ठोठावायची? महाराष्ट्रातला शेतकरी कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या करतो आहे. त्यानेही जर असेच कुणाच्या कानशिलावर बंदूक ठेवून ‘कर्जफेड’ करून घेतली असती तर माननीय न्यायालयाने त्या गरीब शेतकर्‍यालाही फासावर लटकवले असते. हा विषय राहू द्या बाजूला. रामशास्त्र्यांनी आतापर्यंत सरकारी कामात अनेकदा हस्तक्षेप केला आहे, पण आता शिवस्मारकावरच ताशेरे मारल्यामुळे
महाराष्ट्राच्या श्रद्धा व अस्मितेवरच हातोडा
पडला आहे. ‘‘माझगाव कोर्टाची इमारत दुरुस्त करा, नाहीतर समुद्रात होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक रोखू!’’ असा दम एकवेळ दळभद्य्रा पाकिस्तानी अफझलखानाने दिला असता तर त्या अफझलखानाचा आणखी एक कोथळा मराठी माणसाने काढला असता, पण शिवस्मारकास रोखण्याची भाषा करणारे याच मातीतले आधुनिक रामशास्त्री आहेत. अशा प्रकारची न्यायबाह्य (बेताल वक्तव्य कसे म्हणावे? रामशास्त्र्यांचा अवमानच होईल हो!) वक्तव्ये करून रामशास्त्री काय साध्य करू इच्छितात? माझगाव न्यायालयाच्या इमारतीची डागडुजी आवश्यक असेल तर तशी मागणी नियमानुसार करा, पण शिवस्मारकासाठी पैसे आहेत, पण कोर्टाच्या डागडुजीसाठी नाहीत. पैसे मंजूर करा नाहीतर शिवस्मारक रोखू असे वक्तव्य करणे न्यायालयाच्या कोणत्या भाषेत बसते? इकडे आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या दातावर मारायला पैसे नाहीत. मुंबई-ठाण्यातील सामान्यांच्या घरांचा प्रश्‍न बिकट आहे. गिरणी कामगार, पोलीस कर्मचार्‍यांची घरे होत नाहीत व यातील बरीच प्रकरणे न्यायालयातच ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याने लटकून पडली आहेत. सरकारला एखादा आदेशच द्यायचा असेल तर तो याप्रश्‍नी द्या. माझगावचे कोर्ट गळते व ते दुरुस्त व्हायला हवे हे मान्य, पण त्या गळक्या कोर्टावरून तुम्ही छत्रपती शिवाजीराजांचा अवमान करणार असाल तर या रामशास्त्र्यांची डोकी खरोखरच ठिकाणावर आहेत काय? हा प्रश्‍न महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाची जनता विचारल्याशिवाय राहणार नाही. देशाच्या चार स्तंभांपैकी न्यायालय हा एक स्तंभ आहे. पण लोकांनी निवडूून दिलेली ‘राज्यव्यवस्था’ हादेखील एक स्तंभ आहे हे न्यायालयाने विसरू नये. सरकारने एखादा लोकहितकारी निर्णय घ्यावा व न्यायालयाने त्यात हटकून बांबू टाकावा असे आता रोजच घडते आहे. आज ते शिवस्मारकावर बोलले. उद्या सांगतील, ‘इंदू मिलची १४ एकर जागा भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाला द्यायची गरजच काय? हा सरकारी पैसा व जमिनीचा अपव्यय आहे!’ गुजरातेत वल्लभभाई पटेल यांचा उंच पुतळा उभारला जात आहे. त्या उंचीवर व खर्चावरही न्यायालय हातोडा मारेल.
रामशास्त्र्यांच्या डोक्यात
काय येईल त्याचा भरवसा नाही. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काय व कसे करायचे त्याचा निर्णय महाराष्ट्राचे लोकनियुक्त सरकार घेईल व शिवस्मारकास पैसे कमी पडू देणार नाही. प्रश्‍न आहे हे स्मारक समुद्रात करायचे की आणखी कोठे. तेसुद्धा सरकार ठरवेल. आमचे रामशास्त्रींशी भांडण नाही. शिवस्मारकाच्या निमित्ताने छत्रपतींचा अवमान झाला म्हणून आम्हाला आमचे विचार मांडावे लागले. शिवराय जन्माला आले नसते तर काय झाले असते याची चिंता आमच्या रामशास्त्र्यांनी जास्त करावी. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याच्या शत्रूला गाडले नि पुढच्या दीडशे वर्षांत मराठ्यांनी सार्‍या हिंदुस्थानभर तलवार गाजविली. शिवरायांच्या महाराष्ट्रानेच देशाचे व धर्माचे रक्षण केले म्हणून रामशास्त्री आजही सुरक्षित आहेत, नाहीतर कवी भूषण यांनी सांगितल्याप्रमाणे-
काशी की कला जाती
मथुरा मे मस्जिद बसती
अगर शिवाजी न होते
तो सुन्नत होती सबकी …

ही गत सगळ्यांचीच झाली असती व आजचे रामशास्त्रीही त्यास अपवाद नसते. शिवरायांमुळेच आज राष्ट्रीयत्वाचा पुकारा देशात होत आहे. पण त्याच शिवरायांच्या महाराष्ट्राला शहाणपण शिकवून स्वत:ची अक्कल पाजळणारे दिसतात तेव्हा आश्‍चर्य वाटते. जे रामशास्त्री आज शिवस्मारकाच्या बाबतीत ‘बेताल’ विधान करीत आहेत तेच रामशास्त्री मुसलमान, ख्रिश्‍चन व बौद्ध धर्मातील श्रद्धास्थानांविषयी इतकी बेताल विधाने करू शकतील काय? मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र छापले म्हणून फ्रान्समध्ये पत्रकारांची मुंडकी उडवली गेली व वृत्तपत्रांच्या कार्यालयांत रक्ताचे सडे पाडले गेले. शिवस्मारक रोखण्याची भाषा करणारे देशात समान नागरी कायदा लावू शकत नाहीत व ३७० कलमाची तरफदारी हिमतीने करू शकले नाहीत. मशिदींवरील कर्कश बांगा कायद्याला न जुमानता सुरूच आहेत ना! काय केले आमच्या रामशास्त्र्यांनी? बेळगावातील
सीमा बांधवांचा प्रश्‍न
सर्वोच्च न्यायालयात लटकत पडला आहे. तरीही त्या न्यायालयास धाब्यावर बसवून कानडी सरकार बेळगावातील सीमा बांधवांवर जोरजबरदस्तीचा अत्याचार करीत आहे ना! मग हे रामशास्त्री कठोर होऊन या अन्यायाविरुद्ध चवताळून का बरे उठत नाहीत? माझगावचे कोर्ट गळते तसे गरीबांची घरे व झोपड्याही गळत आहेत, पण त्या गरीबास कोणतेच न्यायालय न्याय देत नाही. न्याय विकत मिळतो व न्यायदेवता आंधळी आहे या उक्तीवर ‘अंधश्रद्धा’ ठेवूनच आम्ही ‘यस, माय लॉर्ड’ म्हणून रामशास्त्र्यांपुढे झुकत आहोत. रामशास्त्री आज सरळ सरळ राजकारण करतात. त्यांच्या नेमणुकाच राजकीय आहेत. निवृत्तीनंतरही रामशास्त्र्यांना कुठे राज्यपाल तर कुठे लोकायुक्त, लोकपाल किंवा एखाद्या आयोगाचे अध्यक्षपद हवेच असते. रामशास्त्र्यांनी त्यांच्या भविष्याची चिंता जरूर करावी, पण महाराष्ट्राचा इतिहास, युगपुरुष शिवाजीराजांबद्दल वेडीवाकडी विधाने केलेली चालणार नाहीत. न्यायमंदिरे किंवा रामशास्त्र्यांचे वस्त्रहरण करण्याची आमची इच्छा नाही. तुम्ही किती सचोटीचे आहात याचे आत्मचिंतन तुम्हीच करावयाचे आहे, पण लोकांनी निवडून दिलेल्या लोकशाही राज्यव्यवस्थेचे ‘मालक’ होण्याचा प्रयत्न कराल तर न्यायसंस्थेवर जो थोडाफार विश्‍वास उरला आहे त्यालाही तडा जाईल. राजकारणी व्यक्तींनी जर विश्‍वास गमावला तर पुढच्या निवडणुकीत जनता त्यांना बदलू शकते, परंतु न्यायाधीशांवरचा म्हणजे रामशास्त्र्यांवरचा विश्‍वास उडाला तरी ते सहन करावे लागते, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. छत्रपती शिवाजीसारखा न्यायप्रिय राजा जगाच्या इतिहासात झाला नाही. रयतेच्या काडीसही हात लावू नका, असे आपल्या सैन्याला व सरदारांना बजावणारा हा राजा. स्त्रीचारित्र्यावर घाला घालणार्‍यांना कडेलोटाची सजा फर्मावणारा हा राजा महाराष्ट्रात जन्मास आला व इतिहास घडला. त्या राजाचे शिवस्मारक रोखण्याची भाषा कराल तर याद राखा! होय, माय लॉर्ड! तुमच्याविषयी पूर्ण आदर ठेवूनच आम्ही हे निर्भीडपणे सांगत आहोत. तुमचा कायदा तुमच्यापाशी. महाराष्ट्र फक्त शिवरायांना पुजतो व त्यांचाच कायदा मानतो!

- See more at : http://www.saamana.com/sampadkiya/shivrayanchya-watela-jau-naka#sthash.f83Wgx9b.dpuf

Wednesday 24 February 2016

ब्राह्मणवाद की क्या पहचान चली गयी रोहित की जान

हैदराबादेतील तरुण रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्यानिषेधार्थ मंगळवार दि. २३ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे देशभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी विद्यार्थी. ‘ब्राह्मणवाद की क्या पहचान चली गयी रोहित की जान’, असे लिहिलेले फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते.

Tuesday 23 February 2016

ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त हिंदू होते

ख्रिश्चन धमार्चे संस्थापक येशू ख्रिस्त तामिळ हिंदू होते असा दावा गणेश दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या पुस्तकात करण्यात आला आहे. गणेश दामोदर सावरकर हे विनायक सावरकरांचे ज्येष्ठ बंधू असून आरएसएसच्या संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी १४६ साली ‘ख्रिस्त परिचय’ हे पुस्तक लिहिले होते. त्यात हा दावा करण्यात आला आहे. येशू हे तामिळी ब्राह्मण होते. त्यांचे नाव केशव कृष्ण होते, असे गणेश सावरकरांनी या पुस्तकात म्हटले आहे. गणेश सावरकरांचा हा दावा हिंदू धर्मियांची दिशाभूल करणारा आहे. येशू ख्रिस्त हे हिंदू होते, हे खरे आहे. तथापि, ते ब्राह्मण नव्हे, तर मराठा होते.  त्याचे खरे नाव यशवंत होते. त्या काळी आजच्या सारखी आडनावे लावण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे येशू यांचे घराणे आडनावाच्या जागी क्षत्रिय असे उपनाम लावीत असे. छोट्या यशवंतला प्रेमाने येशू म्हटले जाई. त्यांच्या नावाचे हे लघुरूपच सर्वत्र प्रचलित झाले. तसेच ‘क्षत्रिय’चा अपभ्रंश ख्राईस्ट, ख्रिस्त असा झाला.

मुंबईतील एक ट्रस्ट गणेश दामोदर सावरकरांनी लिहिलेलं 'ख्रिस्त परिचय' पुस्तक पुन्हा प्रकाशित करीत आहे. या पुस्तकात येशू ख्रिस्त जन्माने विश्वकर्मा ब्राम्हण होते. तसंच ख्रिश्चन धर्म हा हिंदू धमार्चाच एक संप्रदाय आहे, ख्रिश्चन असा वेगळा धर्म नव्हता असा दावा करण्यात आला आहे. गणेश दामोदर सावरकर यांच्या पुस्तकात येशू ख्रिस्त यांचा जन्म कुठे झाला याची माहिती देण्यात आलेली नाही. गणेश दामोदर सावरकर यांनी येशूविषयी केलेले दावे पुढील प्रमाणे आहेत.

  • १. पॅलेस्टिन आणि अरब प्रदेश हिंदूंचाच होता आणि येशू ख्रिस्त प्रवास करत भारतात पोहोचले होते जिथे त्यांनी योगाचं शिक्षण घेतलं. 
  • २. येशू ख्रिस्त तामिळ हिंदू असून त्यांच खरं नाव केशव कृष्ण होतं. तामिळ त्यांची मातृभाषा होती आणि त्यांचा रंग तामिळ लोकांप्रमाणे गडद होता. 
  • ३. येशू ख्रिस्त यांच्या 12व्या वर्षी मंदिरात ब्राम्हण परंपरेप्रमाणे त्यांची पवित्र मुंज करण्यात आली होती. 
  • ४. पॅलेस्टीन तसेच आजूबाजुच्या प्रदेशात राहणारे लोक येशू ख्रिस्त यांना शंकर, विष्णुचा अवतार मानित असत.
  • ५. ख्रिश्चन धमार्चा पवित्र ग्रंथ बायबल ही येशू ख्रिस्त यांची शिकवण नसल्याचा दावा गणेश दामोदर सावरकर यांनी केला आहे. 

गणेश दामोदर सावरकर यांनी येशू यांचा इतिहास लिहिताना अनेक खोट्या गोष्टी रेटल्या आहेत. त्यांनी मांडलेला इतिहास कसा खोटा आहे, हे वरील ५ मुद्यांच्या बाबतीत तपशीलवार पाहू या :

  • १. येशू यांचा जन्म पॅलेस्टिनमध्ये नव्हे, तर महाराष्ट्रातील आताच्या फलटण येथे झाला. फलटणचे प्राचीन नाव फलस्तान (फळे देणारे ठिकाण) असे होते. येशू यांनी धार्मिक शिक्षण घेतल्यानंतर जगभर भ्रमंती केली. व शेवटी ते अरब प्रदेश तसेच आजच्या इस्रायल, पॅलेस्टिन या भागात स्थिरावले. आपल्या जन्भूमीची आठवण म्हणून त्यांनी या भागाला फलस्तान असे नाव दिले. त्याचा अपभ्रंश होऊन पॅलेस्टिन झाले. आज हेच नाव रूढ असून, ते महाराष्ट्रातील फलटणची आठवण जागविणारेच आहे. 
  • २. गणेश दामोदर सावरकर यांनी म्हटल्याप्रमाणे येशू काळ्या रंगाचे तमिळी असते, तर  इस्रायल, पॅलेस्टिनमधील गो-या लोकांनी त्यांचा स्वीकार केलाच नसता. तसेच त्यांचे नाव नाव केशव कृष्ण असते, तर त्यांना येशू का म्हटले गेले असते? याचे उत्तर सावरकर देत नाहीत. 
  • ३. येशू यांची १२ वर्षी परंपरेप्रमाणे मुंज झाली असती, तर त्यांच्या गळ्यात जाणवे असते. तथापि, त्याचा कोठेही उल्लेख येत नाही. उलट येशू यांना मुकूट घातल्याचा उल्लेख बायबलमध्ये आहे. त्यांना वधस्तंभावर चढविण्यात आले तेव्हाही, त्यांना काटेरी मुकूट घालण्यात आला होता. मुकूट घालण्याची प्रथा राजघराण्यात असते. येशू यांचा उल्लेख बायबलमध्ये ‘यहुद्यांचा राजा’ असाच येतो. त्यावरून ते राजघराण्यातील होते, हे सिद्ध होते. येशू हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध यादव वंशातील होते.  ‘यादव’चे 'यावद' व पुढे 'याहुद', 'यहुदा' असे रूप झाले. 
  • ४. फलस्तान म्हणजेच आजच्या पॅलेस्टिनच्या आजूबाजूच्या प्रदेशात राहणारे लोक येशू यांना भगवान शंकराचा अवतार मानून महेश असेही संबोधित असत. महेशचा अपभ्रंश होऊन महीस, मसीह अशी रुपे तयार झाली. त्यातूनच त्यांना येशू मसीह हे नाव मिळाले. मराठा समाज प्राचीन काळापासूनच शंकराचा उपासक राहिला आहे. मराठेशाहीची स्थापना करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी शंकराच्या पिंडीवरच शपथ घेतली होती. हे येथे उल्लेखनीय होय.
  • ५. बायबलमधील शिकवण ही येशूचीच शिकवण आहे. त्या काळी महाराष्ट्रातील प्रचलित असलेल्या गोष्टीच येशू यांनी बायबलमध्ये सांगितल्या आहेत.